परवा सचिन तेंडूलकर राज्यपालांना जाऊन भेटला, प्रत्येक दिवशी विद्यार्थ्यांना शाळेत किमान एक तास खेळाचा असावा, अशी मागणी त्याने केली. भारतात जर आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवायचे असतील तर त्याची सुरुवात शाळेपासूनच होणे गरजेचे आहे. असे ही त्यांचे म्हणणे होते.
शालेय जीवनात कला, क्रीडा व कार्यानुभव विषयाची एवढी मोठी गरज असताना राज्य सरकारने मात्र उलटी पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. शिक्षक संचमान्यतेतून कला, क्रीडा व कार्यानुभव शिक्षकांना वगळले आहे. प्रश्न कला, क्रीडा शिक्षकांच्या नोकरीचा नाही. ज्या विषयाची आवड विद्यार्थ्यांना आहे, ज्या विषयाची गरज विद्यार्थ्यांना आहे, तेच विषय वगळले तर सुदृढ आणि सक्षम पिढी निर्माण कशी होणार? शाळा चार भिंतींचे कोंडवाडे नाही होणार का? अशा कोंडवाड्यात शिक्षण कसे होणार? केवळ शिक्षणावरचा खर्च कमी करण्यासाठी मुलांचे भविष्यच सरकार अंधारात लोटत आहे. काही मुला- मुलींसाठी तर शाळेचे क्रीडांगण ही एकमेव हक्काची खेळण्याची जागा आहे. मुलींना मैदानात जाऊन खेळू दिले जात नाही.
शालेय शिक्षण हे विद्यार्थ्याला जगायचे कसे शिकवते परंतु कला ही कशासाठी जगायचे हे शिकवते. शाळेत प्रवेश करताच शाळेचे रुप बदलले दिसते ते केवळ कला शिक्षकामुळे. कला शिक्षकांचा केवळ चित्रकारच नाहीतर अनेक इंजिनिअर्स, डॉक्टर्स घडविण्यात फार मोठा वाटा असतो. कला शिक्षकांमुळे शाळा जिवंत वाटते. संगीत, कला, कार्यानुभव हे विषय शाळेचे प्राण आहेत. परंतु याही शिक्षकांना शासनाने आता संचमान्यतेद्वारे बाहेर काढलेले आहे. जवळपास तीस टक्के पदे रद्द केली आहेत. रिक्त पदे जवळपास ५० हजार आहेत.
शाळेची शिस्त म्हणजे क्रीडाशिक्षक!
करडया तरीही स्नेहपूर्ण वातावरणात विविध खेळांचे प्रशिक्षण क्रीडा शिक्षक देत असतो. किमान २५० विद्यार्थ्यांमागे एक क्रीडा शिक्षक असायलाच हवा असा शासनाचा जीआर सांगतो. शाळा तिथे कला, क्रीडा, कार्यानुभव शिक्षक असणे गरजेचे आहे. आरटीई कायद्यातील तरतुदींचा गैरफायदा घेत शासनाने या शिक्षकांना शाळेतुन हद्दपार केले आहे. ५००० रुपये मानधनावर तात्पुरते शिक्षक नेमण्याची अतिथि निदेशक नेमले. १०० विद्यार्थ्यांमागे अर्धवेळ शिक्षक यांचा अर्थ. २०० विद्यार्थ्यांमागे एक पूर्णवेळ कला, क्रीडा व कार्यानुभव शिक्षक शाळेला द्यायला हवा होता. ते कायद्याने बंधनकारक असताना त्या सर्व शिक्षकांना अर्धवेळ करून त्यांना पाच हजार रुपये नाममात्र मानधनावर शाळेमध्ये तात्पूर्ती नियुक्ती देण्यात आली. तीन वर्षांनंतर त्यांनाही शाळेतून काढून टाका असेही सांगण्यात आले आहे. हे अतिशय गंभीर आहे. सचिन तेंडुलकर जसा खेळासाठी पुढे आला तसे राज्यातील सर्व खेळाडू्ंनी व कलाकारांनी पुढे यायला हवे. शासनाला विनंती करायला हवी की शाळेसाठी कला, क्रीडा, कार्यानुभव विषयाची गरज आहे. कला, क्रीडा, कार्यानुभवाच्या शिक्षकांना संच मान्यतेत घेण्यात यावे. त्यांची भरती करावी, त्यांना विशेष शिक्षकांचा दर्जा बहाल करण्यात यावा. अतिथी निदेशकांना पूर्णवेळ करून त्यांना शिक्षकांचे वेतन सुरू करावे. या लढाईसाठी आता कला, क्रीडा व कार्यानुभव शिक्षकांना रस्त्यावर उतरावे लागेल . मोठा लढा द्यावा लागेल, संघर्षातून विजय हमखास येऊ शकतो. भावी पिढी वाचवायची असेल तर आपण सर्वांनी एक होणे गरजेचे आहे. मला खात्री आहे, राज्यातील कला, क्रीडा व कार्यानुभव शिक्षक व इतर सर्व शिक्षकांनी या लढयात सामील व्हावे. सर्व संघटनाही या लढ्यात सामील होतील. २४ ऑक्टोबर 2018 रोजी शिक्षक भारतीच्या कार्यालयात राज्यातील कला, क्रीडा व कार्यानुभव शिक्षकांची मिटिंग झाली. भविष्यातील लढयासाठी एल्गार फुंकण्यांत अाला. आमदार कपिल पाटील येत्या अधिवेशनामध्ये कला, क्रीडा कार्यांनुभव शिक्षकांचे प्रश्न सभागृहात उचलणार आहेत .परंतु रस्त्यावरची लढाई आपणालाच लढायला हवी आणि मला खात्री आहे आपणही सर्वजण या लढाईत सामील व्हाल!!
लढेंगे! जितेंगे!!
जालिंदर देवराम सरोदे
प्रमुख कार्यवाह, शिक्षक भारती.