Tuesday 17 December 2019

विद्यार्थी पिढी आजची आणि कालची ....


आजकाल पालक आणि शिक्षकांमध्ये  कालौघात बदललेल्या पिढीबाबत वेगळे उद्गार ऐकू येतात "आमची पिढी अशी नव्हती." मागच्या पिढीतील आणि आत्ताच्या पिढीतील विद्यार्थ्यांमध्ये फरक नक्कीच आहे, असतोच!

एक शिक्षक, पालक, विद्यार्थी व शिक्षक चळवळी नेता म्हणून मी या गोष्टींकडे बारकाई ने पहातो. आजचा विद्यार्थी हा टेक्नोसेव्ही आहे. तो प्रचंड वेगवान आहे. त्याच्यासोबत धावताना पालकांची व शिक्षकांची प्रचंड दमछाक होते. परिणामी विद्यार्थांना समजून घेताना जर थोडीशी गल्लत झाली तर पाल्य, पालक व शिक्षक यांमध्ये संघर्ष निर्माण होतो. ही दरी लवकर बुजवली नाही तर विद्यार्थी, पालक व शिक्षकांपासून त्याने दुरावू नये म्हणून दोघांमध्ये सामंजस्यात्मक तारतम्य ठेवावे लागते. हया दरीतील अंतर कमी करून त्याचे दुरावलेपण कमी करता येते. तो आपले स्वत:चे असे विश्व शोधू लागतो. ब-या वाईट संगतीच्या आहारी जाण्याची शक्यता जास्त वाढते. तो एकलकोंडा होतो किंवा तो कोणालाही जूमानत  नाही. पालक व शिक्षकांचा टारगेट होतो.  अभ्यासात मागे पडतो.  त्याचा पालकांशी संवाद तुटतो. यामागील कारणांचा शोध घेणे पण क्रमप्राप्त होतं.

एक पिढी म्हणजे बारा किंवा पंचविस वर्षांचे अंतर. आज मुले, पालक किंवा शिक्षक यांमध्ये किमान १ ते २ पिढ्यांचे अंतर आहे. साधारणपणे पालक व शिक्षकांची पिढी ही जेंव्हा शालेय शिक्षण घेत होती. तेंव्हा करमणूकीची साधने ही फार कमी असायची. मुलं तेंव्हा मैदानावर खेळताना आढळायची तर मुली घरातील अंगणात खेळताना. त्याकाळी मोबाईल, संगणक, टिव्ही हे सर्व दुरापास्त. अशा वातावरणात मुलांचा पालकांशी संवाद जास्त असायचा. शालेय ज्ञान केवळ शिक्षकच देत असंत. क्लास संस्कृती  फोफावलेली नव्हती. जे क्लास चालायचे  ते कमर्शिअल नव्हते. त्यात प्रेम, जिव्हाळा, आपुलकी होती व्यवहार नव्हता.  त्यामुळे शिक्षकांबद्दल विद्यार्थी व पालकांमध्ये प्रचंड आदर होता. मुलांचं भविष्य शिक्षकांच्या हाती सोपवलं जायचं. घरी संभाळण्यासाठी, माया करण्यासाठी आजी, आजोबा नावाचे मित्रं असत नव्हे तर ते एक सुरक्षा कवच असे. त्यामुळे शिक्षक व पालकांच्या काळातील शैक्षणिक वातावरण फार वेगळे व आपुलकीचे होते. विद्यार्थांच्या शिकण्याचे माध्यम मातृभाषा होती. संदर्भ साधनं मोजकीच होती. अभ्यासक्रम मर्यादित होता. अशैक्षणिक कामांचा दबाव नव्हता. सरकारी शाळा हाच शिक्षणासाठी पर्याय होता. विनानुदानित, कायमविनानुदानित, इतर बोर्डांच्या शाळांचे पेव नव्हते. जीवघेणी स्पर्धा नव्हती. शाळांमध्ये, घरांमध्ये आनंददायी वातावरण असायचं. अशा वातावरणात शिकून मोठे झालेले शिक्षक, पालक आपल्या भावविश्वाचे दाखले मुलांना देतात.  आणि घरात, शाळेत कुरबुरी सुरु होतात.

आजच्या विद्यार्थांचा विचार केला तर शिक्षणात स्पर्धा (रॅट रेस) प्रचंड वाढलेली आहे. आजच्या शिक्षण पद्धतीत मुलांचे भावविश्व लोपत चालले आहे. अनेक बोर्ड त्यांचे वेगवेगळे अभ्यासक्रम राबवले जात आहे. शिवाय इंग्रजी भाषा व्यवहाराची भाषा झाल्यामुळे मातृभाषेऐवजी इंग्रजीचा  अट्टाहास धरला जात आहे. त्यामुळे पालक व विद्यार्थी यामध्ये संवाद कमी होत चालला आहे. शहरीकरण प्रचंड प्रमाणात वाढलं आहे. सोशल मिडिया आपल्या घरात, हातात आलेला आहे. टिव्ही, संगणक, मोबाइल, ईंटरनेट यांनी पालक, शिक्षक व मुलांना गुरफटुुन टाकलेलं आहे.  माहिताचा प्रचंड स्त्रोत एका क्लिकवर उपलब्ध आहे. आज पालकांनी वेग,राहणीमान व आराम या त्रयीला आपलं साध्य मानलेलं आहे. पालकांना मुलांसाठी वेळंच नाही. आई, वडिल दोघेही नोकरदार आहे. विभक्त कुटुंबपद्धतीमुळे घरात आजोबा, आजी रहात नाहीत. अनियंत्रित लोकसंख्या वाढ या सर्व सुबत्तेला गिळंकृत करत असल्याने स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी उच्च दर्जाचे शिक्षण आपल्या पाल्याला मिळावे अशी प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते. पालकांनाही घरात महागड्या वस्तू, आपलं पॉश राहणीमान, सम्रृद्ध बॅंकबॅलन्स, ट्रॅव्हल्स या सर्व बाबी हव्या असतात. परिणामी आपल्या स्टेटसला साजेशी शाळा शोधली जाते. त्यासाठी लाखो रुपये फी मोजली जाते.  बदलता अभ्यासक्रम, शिक्षणाचे माध्यम व अपुरा वेळ यामुळे मुलांना क्लासेस मध्ये पाठवले जाते. पालकांना सकाळी झोपेतून उठवत नाहीत परंतु त्या वेऴी मुलांना अंघोळ घालून, टापटिप टाय बांधुन मुलांना बसस्टॉपवर उभे केले जाते. स्पर्धेच्या युगात मुलांचं बालपण हिरावून घेतलेलं आहे. 
                           
मुलांच्या वर्तनाबाबत पालकांच्या व शिक्षकांच्या प्रचंड तक्रारी आहेत. मुलं ऐकत नाहीत, वाचत नाहीत. क्लासमध्ये शिकून आले असल्यामुळे वर्गात लक्ष देत नाहीत. मुलांना ओरडण्याची, बोलण्याची तर सोयच राहीलेली नाही. मुलांना मारणं म्हणजे स्वत:च्या नोकरीवर पाणी फेरणे किंवा तुरुंगवास स्विकारणं. वर्गात अर्धा तास शिकवणं म्हणजे एक मोठं दिव्यंच झालं आहे. पालकांकडे तक्रार करावी तर पालकही हतबलं असतात. मुख्याध्यापक हात झटकून टाकतात. यामुळे केवळ मुलंच नाही तर पालक व शिक्षकही प्रचंड तणावाखाली आहेत. अशैक्षणिक कामांचा प्रचंड ताण शिक्षकांवर आहे. बिएलओ ते अॉनलाइन सर्व प्रकारची कामे शिक्षकांना करावी लागत आहेत. अन्यथा पोलिस कारवाईला सामोरे जाण्याची मानसिक तयारी करावी लागते. 

याला फार मोठ्या प्रमाणात शिक्षण खातेही जबाबदार आहे. त्यांनी शाळेतील कला, क्रीडा शिक्षक हद्दपार केला. संचमान्यतेतून त्याचं वेगळ अस्तित्वच मिटवून टाकलं. जे कला, क्रिडा शिक्षक  शाळेत उरलेत त्यांना विषय शिक्षक बनवलं. यातून मुलांना खेळ दुरापास्त झालाय. शहरीकरणामुळे क्रीडागणं उपलब्ध नाहीत. अंगणं राहिली नाहीत. मुला, मुलींना घर म्हणजे क़ोंडवाडा झालेला आहे. त्यामुळं घरात बसून ती सोशल मिडियाच्या आहारी गेलेली आहेत. घरात त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी कोणीही उपलब्ध नाहीत. ही मुलं जेंव्हा पाळणाघरात वाढतात तेंव्हा ती एकलकोंडी, अशक्त, अकाली चष्मा लागलेली दिसतात.  

अशा पिढीचं एकमेव अशास्थान शिक्षक आहे. शिक्षकांनी आपले अध्य़यन विद्यार्थीकेंद्री करायला हवं. विद्यार्थ्यांना मुळ ज्ञान स्त्रोतापर्यंत  घेऊन जातो तोच खरा शिक्षक. प्रत्येक विद्यार्थी आपल्या क्षमतेप्रमाणे शिकत असतो मात्र त्याच्या मनात ज्ञानाच्या बिया टाकण्याचं व त्यापासून उगवलेल्या रोपाचे संगोपन करण्याचं महत्त्वपूर्ण काम शिक्षकाला करावं लागतं. विद्यार्थी नकारात्मक न राहता सकारात्मक कसा राहील या दृष्टीने शिक्षकांनी प्रयत्न करणे गरजेचं असतं. त्यासाठी शिक्षकांनी स्वतःला अपडेट ठेवलं ठेवायला हवं. आज विद्यार्थी टेक्नोसेवी झालेले आहेत. आज एका क्लिकवर त्यांना हवी ती माहिती मिळते. संगणकावर किंवा इंटरनेटवर मिळालेली माहिती म्हणजे ज्ञान नव्हे हे विद्यार्थ्यांना पटवून द्यायला हवे. माहिती केवळ गोळा करायची नाही तर माहितीचं सुक्ष्म वाचन कसं करायचं, त्याचं विश्लेषण नेमके कसं करायचं आणि त्यातून आपण नेमकं काय घ्यावं हे सांगायला हवं. याबाबतचा साधकबाधक विचार विद्यार्थांना देणं ही आधुनिक शिक्षकाची महत्वाची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी टेक्नोसेवी होणं गरजेचे आहे.  विद्यार्थी केंद्रित आपली अध्यापन पद्धती व्हायला हवी. विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी मुलांना आवडतील अशा नवनवीन योजना आणि  आडाखे शिक्षकांचे तयार असायला हवे. पिढी दर पिढी बदल होतंच असतात.. आणि दोन पिढीतील दरीही! यासाठी पाल्य किंवा विद्यार्थी  यांच्या कलाने, त्यांची बाजू समजून घेऊन त्यांच्याशी पालक - शिक्षकांनी संवेदनशीलपणे वागण्याची गरज आहे. तरच पुढील पिढीशी समन्वय साधून अपेक्षित बदल नक्कीच घडवून आणता येईल!                            

जालिंदर देवराम सरोदे          
प्रमुख कार्यवाह,                        
शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य .                                
अध्यक्ष- मुंबई ग्रॅज्युएट फोरम.

6 comments:

  1. माहितीपूर्ण लेख आहे सर.

    ReplyDelete
  2. अतिशय सुरेख लेख आहे सर, वास्तविकता आहे .

    ReplyDelete
  3. अत्यंत अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण लेख आहे
    आपले मनःपूर्वक अभिनंदन सर

    ReplyDelete
  4. सर खूपच अभ्यासपूर्ण लेख लिहिला आहे. आता शिक्षण क्षेत्रातील बदलला सुरुवात होण्याची चळवळ या लेखातून सुरू व्हावी ही अपेक्षा आहे.शासनाच्या धोरणाबरोबर खाजगी अनुदानित शाळा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा यांनी कात टाकणे खूप गरजेचे आहे.

    ReplyDelete
  5. This comment has been removed by the author.

    ReplyDelete