सप्रेम नमस्कार,
महाराष्ट्र राज्य मंडळाने मराठी, हिंदी व इंग्रजी विषयांचे अंतर्गत (तोंडी परीक्षा)गुण बंद केले आहेत. याचा सर्वात मोठा फटका आपल्या विद्यार्थ्यांना बसणार आहे. यावर्षी एसएससी परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयाचे शंभर मार्कांचे लेखी पेपर्स द्यावे लागणार आहेत. सीबीएसई, आयसीएससी, आयबी व इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांना ४०पर्यंतचे अंतर्गत गुण मिळणार आहेत. त्यामुळे आपल्या एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांची टक्केवारी कमी होणार आहे. नापास विद्यार्थ्यांची संख्याही वाढणार आहे. एसएससी बोर्डातून परीक्षा देणार-या विद्यार्थ्यांना नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार नाहीत. विद्यार्थ्यांच्या पालकांना याबाबत कोणतीही कल्पना नाही. विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आपण लढायला हवे.
आपण शाळांमध्ये पालक सभा घेऊन विद्यार्थ्यांच्या पालकांना याबाबत माहिती द्यायला हवी. आपण या सर्व पालकांचे निवेदन घेऊन ते माननीय शिक्षणमंत्री व महाराष्ट्र राज्य बोर्डाला पाठवुया.शिक्षक भारतीच्या ऑफिसमध्येही एक प्रत पाठवा. आपण जर शाळांमध्ये अशा मिटींगा घेतल्या आणि त्याचे निवेदन तयार करून शासनाला पाठवली तर शासन नक्कीच आपल्या मागण्यांची दखल घेईल. आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी एवढे नक्कीच करूया.
आपण विद्यार्थी प्रिय आहात. विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही याची काळजी आपणच घ्यायला हवी. आपली लढाई आपल्यालाच लढावी लागेल. पालकांना या विषयाची दाहकता लक्षात आणून दिली तर पालक नक्कीच या लढय़ात उतरतील. बेस्ट फाईव्हसाठी शिक्षक भारतीने व आमदार कपिल पाटील यांनी अशीच लढाई उभी केली होती. तत्कालीन शिक्षणमंत्र्यांनी आपली मागणी मान्य केली व राज्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला. टॉपच्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू लागला. अंतर्गत गुणांसंदर्भात आमदार कपिल पाटील हे हिवाळी अधिवेशनात आवाज उठवणार आहेत. आपणही पालकांची निवेदने सरकारला पाठवू या. सरकारवर दबाव वाढवुया.
लढूया - जिंकूया!
![]() |
| एसएससी बोर्डाने भाषा विषयांचे २० अंतर्गत गुण रद्द केले आहेत. त्याबाबत आमदार कपिल पाटील यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पत्र लिहून फेरविचार करण्याबाबत विनंती केली आहे. |
![]() |
| एसएससी बोर्डाने भाषा विषयांचे २० अंतर्गत गुण रद्द केल्याबद्दल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना शिक्षक भारतीचे पत्र. २० गुण परत देण्याची मागणी. |
जालिंदर देवराम सरोदे
प्रमुख कार्यवाह, शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य.











